TOD Marathi

CET आणि बारावीच्या गुणांना ५०-५० टक्के वेटेज; पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी

CET आणि बारावीच्या गुणांना ५०-५० टक्के वेटेज; पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी

राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए आदी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सीईटी (CET) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून बारावीचे ५० टक्के गुण आणि सीईटीचे ५० टक्के गुण एकत्रित करुन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. पुणे येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यातील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी विद्यार्थी सीईटी परीक्षांची तयारी करतात, मात्र बारावीच्या परीक्षेकडे त्यामुळे दुर्लक्ष केले जाते. बारावी बोर्ड परीक्षेचे महत्त्व अबाधित राहण्यासाठी हा निर्णय घेण्याचा प्रस्ताव राज्य सरकारपुढे गेल्या काही कालावधीपासून होता.

दरम्यान, बारावीनंतर राज्याच्या सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सद्यस्थितीत विविध अभ्यासक्रमांसाठी तब्बल १६ विविध प्रकारच्या सीईटी घेतल्या जातात. ही संख्या देखील कमी करण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती सामंत यांनी यावेळी दिली.

यंदाच्या वर्षी एमएचटी सीईटी (MHT CET) आणि अन्य परीक्षा जुलै महिन्यात होणार आहेत. परीक्षांच्या आयोजनास विलंब होत असला तरी परीक्षा होताच पुढील दहा दिवसात निकाल लावला जाणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले. पुढील वर्षापासून मात्र कोणत्याही परिस्थितीत १ जुलैपर्यत सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू करणार, असे त्यांनी सांगितले.