TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 20 जुलै 2021 – देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवलेली आहे. असे असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज (मंगळवारी) चौथ्या राष्ट्रीय सेरो सर्वेचे निष्कर्ष जाहीर केलेत.

यात असे सांगण्यात आले आहे की, देशात मुलांसह दोन तृतीयांश नागरिकांत करोनाविरोधातील अँटीबॉडीज विकसित झाल्याचे आढळले आहेत. यासह अद्यापही सुमारे ४० कोटी भारतीयांना करोनाचा धोका आहे, असे समोर आले आहे.

या सर्वेक्षणात असे दिसले आहे की, ६ ते १७ वयोगटातील ५० टक्क्यांहून अधिक मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्यात.

आयसीएमआरने चौथ्या सेरो सर्वेची आकडेवारी जाहीर केलीय. या सर्व्हे जून – जुलै दरम्यान केला होता. २८ हजार ९७५ लोकांवर केल्या गेलेल्या सर्वेत ६ ते १७ वर्षे वयोगटतील मुलांचा देखील समावेश केला होता. सर्व्हेमध्ये सहभागी ६७.६ टक्के लोकांत कोरोना अँटीबॉडीज आढळल्या आहेत.

या सर्व्हेमध्ये २८ हजार ९७५ लोकांना सहभागी करून घेतलं गेलंय. यात ६ ते ९ वर्ष वयोगटातील २ हजार ८९२ मुलं, १० ते १७ वयोगटातील ५ हजार ७९९ मुलं आणि १८ वर्षा पेक्षा अधिक वय असणाऱ्या २० हजार २८४ जणांचा समावेश होता.

या सर्व्हेमध्ये हेही दिसले आहे की, ६ ते ९ वर्षाच्या ५७.२ टक्के आणि १० ते १७ वर्षाच्या ६१.६ टक्के मुलांत करोना अँटीबॉडीज आढळल्यात. तर, १८ ते ४४ वर्षाच्या ६६.७ टक्के, ४५ ते ६० वर्षांच्या ७७.६ टक्के आणि ६० वर्षावरील ७६.७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज दिसल्या आहेत.

सर्व्हेमध्ये सहभागी ६९.२ टक्के महिला व ६५.८टक्के पुरूषांमध्ये कोरोना विरोधात अँटीबॉडीज आढळल्यात. शहरी भागात राहणाऱ्या ६९.६ टक्के व ग्रामीण भागात राहणाऱ्या ६६.७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज होत्या.

या सर्व्हेमध्ये सहभागी १२ हजार ६०७ लोक असे होते, ज्यांनी लस घेतलेली नव्हती. ५ हजार ३८ जण असे होते ज्यांनी एक डोस घेतला आहे आणि २ हजार ६३१ जण दोन्ही डोस घेतलेले होते.

या सर्व्हेतून असे समोर आले की, दोन्ही डोस घेतलेल्या ८९.८ टक्के जणांमध्ये आणि एक डोस घेतलेल्या ८१ टक्के जणांमध्ये अँटीबॉडीज आढळल्यात. तर ज्यांनी लस घेतली नव्हती अशापैकी ६२.३ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज दिसल्या. त्यामुळे असे मानले जात आहे की, लस घेतल्यानंतर अँटीबॉडीज निर्माण होत आहेत.