TOD Marathi

नवी दिल्ली: मी जेवढं सत्य बोलेन, लोकांच्या समस्यांवर जितका आवाज उठवेन, तेवढेच अधिक हल्ले माझ्यावर होतील. आणखी जोमाने कारवाई होईल. पण मी कोणालाही घाबरत नाही. मी सत्य बोलत राहीन. महागाई आणि बेरोजगारीच्या समस्येवर आवाज उठवत राहीन, असे प्रतिपादन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केले. ते शुक्रवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (Rahul Gandhi PC Delhi) राहुल गांधी यांनी यावेळी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. (Congress MP Rahul Gandhi Slams RSS)

सध्या देशातील सर्व यंत्रणा सरकारला पाठिंबा देताना दिसत आहेत. त्याचे कारण म्हणजे, या संस्थांमध्ये भाजपने आपले लोक बसवून ठेवले आहेत. एकही यंत्रणा आताच्या घडीला स्वायत्त राहिलेली नाही. प्रत्येक संस्थेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आहेत. त्यामुळे काँग्रेस फक्त एका राजकीय पक्षाशी नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेशी लढत आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. सध्या सरकारी संपूर्ण संस्थात्मक यंत्रणा एका पक्षासोबत आहे. कोणीही दुसऱ्या राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा प्रयत्न केला की त्याच्यापाठी ईडी आणि सीबीआय लागतात. त्यांना धमकावले जाते, घाबरवले जाते. त्यामुळे देशात सध्या राष्ट्रीय स्वयसंसेवक संघाची (Rashtriya Swayamsevak Sangh) आर्थिक आणि संस्थात्मक एकाधिकारशाही आहे, असेही टीकास्त्र राहुल गांधी यांनी सोडले.
देशात महागाई आणि बेरोजगारी वाढत आहे. पण केंद्र सरकार ही बाब मान्य करायला तयार नाही. मी या सगळ्या गोष्टींवर जितकं अधिक बोलेन, माझ्यावरील हल्ले तितके अधिक तीव्र होतील. जो सतत धमकावतो, तो घाबरत असतो. आपला खोटेपणा जनतेसमोर उघडा पडू नये, याची केंद्र सरकारला भीती आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.