TOD Marathi

नवी मुंबई:

जी व्यक्ती बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची होऊ शकली नाही तो माणूस नवी मुंबईकरांचा काय होणार, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. नवी मुंबईत उड्डाणपुलासाठी होऊ घातलेल्या झाडांच्या कत्तलीवरून नवी मुंबईतील सध्या जोरदार राजकारण पेटले आहे. या मुद्द्यावरुन आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. (BJP and NCP agitation against tree cutting in Navi Mumbai)

वृक्षतोडीचा हा ठराव नवी मुंबईला स्वत:ची सल्तनत मानणाऱ्या गणेश नाईकांच्या पुढाकारानेच २००८ साली मंजूर झाला होता आणि या पापाची जाणीव गणेश नाईक यांचं मन आतल्याआत खात आहे. त्यामुळेच आज आमच्या आंदोलनाच्या दिवशी गणेश नाईक यांनीही आंदोलन केले. याठिकाणी वृक्षांची कत्तल करुन ४५० कोटी रुपयांचा उड्डाणपूल बांधण्याचा ठराव नाईक यांनीच मंजूर करवून घेतला होता. गणेश नाईक ही स्वार्थी व्यक्ती आहे, हा माणूस कधीच कोणाचा होऊ शकला नाही. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना घडवलं त्यांची साथ नाईकांनी सोडली. ज्या शरद पवारांनी सत्तेतला सगळा वाटा आणि संपूर्ण जिल्हा हवाली केला त्यांच्याशीही गणेश नाईकांनी ईमान राखले नाही. असा माणूस नवी मुंबईकरांचा काय होणार, असा सवाल मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विचारला.

नवी मुंबईत झाडांची कत्तल रोखण्यासाठी गणेश नाईक यांच्या नेतृत्त्वात भाजपकडून (BJP) मोर्चा काढण्यात आला. नवी मुंबईतील वाशी अरेंजा सर्कल ते कोपरी असा २ किमीचा हा उड्डाणपूल होणार आहे. या उड्डाणपुलासाठी ४०० झाडे कापली जाणार आहेत. तसेच एमआयडीसी महापे विभागीय कार्यालयाकडून रस्त्याच्या रूंदीकरणाचेही काम हाती घेतले आहे. हे काम करत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या जवळपास अडीच हजाराच्या वर झाडांचा बळी यात जाणार आहे. आणि आता या सगळ्याविरोधात नवी मुंबईतील राजकीय पक्ष मैदानात उतरताना दिसत आहेत.