TOD Marathi

मुंबई: राज्यात सध्या विचित्र राजकारण सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोन दिग्गज नेत्यांमधील वाद आणि यावरून सुरु असलेले राजकारण सध्या राज्यात चांगलंच सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

यावेळी बोलताना पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस हे असे दबंग नेते आहेत कि असले १०० अजित पवार खिशामध्ये घेवून फिरतात. ते उद्धव ठाकरेंसारखे नाहीत कि सरकारमध्ये काय चालले आहे आणि नाही हेच ठावूक नाही. शिवसेनेने भयंकर त्रास देवून देखील ते ५ वर्षे मुख्यमंत्री राहिले, हि सोप्पी गोष्ट नव्हती, असे मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप बाहेर काढणारअसल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. घोटाळ्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार सापडत आहेत. दोन काँग्रेसच्याही नेत्यांची नावे आली आहेत. दोन दिवसात त्यांचेही विषय समोर येतील, असं विधान करून पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.