TOD Marathi

टिओडी मराठी, नाशिक, दि. 24 ऑगस्ट 2021 – केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावण्याचे वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे.

नारायण राणे यांच्यावर नाशिक, पुणे आणि महाड येथे गु्न्हा दाखल केला आहे. नाशिक येथून नारायण राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक रवाना केले आहे.

नारायण राणे यांच्यावर झालेल्या गुन्ह्यांचे गांभीर्य पाहून यासंदर्भात पुनरावृत्ती टाळण्यासाठी राणेंना अटक करण्यासाठी पथक पाठवले आहे. केंद्रीय मंत्रीपदाचा आदर राखून तसंच हक्कभंग होणार नाही, याची दक्षता घेऊन कारवाई केली जाईल, असेही आयुक्त दीपक पांडेय यांनी सांगितले आहे.

जन आशीर्वाद यात्राप्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी भाजप नेते आणि कार्यकर्ते याच्या विरोधात अगोदरच २२ एफआर दाखल केलेत. मात्र, त्यात नारायण राणे यांच्यावर एफआयआर दाखल झालेला नव्हता.

राणे सोमवारी महाडमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दही हंडीवर महाराष्ट्र सरकारने घातलेल्या बंदीवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरले.

ते म्हणाले,’ मला मुख्यमंत्र्यांची लाज वाटते. मुख्यमंत्र्यांना देशाला स्वातंत्र कुठल्या वर्षी मिळाले ते वर्ष सुद्धा माहिती नाही. स्वातंत्रदिनाच्या भाषणात हे दिसले. मी तेथे असतो तर एक कानाखाली लगावली असती.’

राणेंच्या या वक्तव्याने शिवसैनिक संतापले आहेत. त्यांनी राज्यात विविध ठिकाणी निदर्शने करत आहेत. राणे यांच्याविरोधात नाशिक येथे पोलीस तक्रार दाखल झाली आहे. तसेच नारायण राणे याच्या अटकेचा आदेश दिला आहे.

दरम्यान, मुंबईत राणेपुत्र खासदार नितेश यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून घराला वेढा घातला. यावर निलेश राणे यांनी ट्विटरवरून ‘ सिंहाच्या गुहेत कुणीच घुसू शकत नाही. घराबाहेरच्या गर्दीला मुंबई पोलिसांनी हटवावे. अन्यथा, पुढे जे घडेल त्याला मुंबई पोलीस जबाबदार असतील’ असे म्हटले आहे.