TOD Marathi

“उद्या कोर्टात काय व्हायचं ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे,” असं वक्तव्य शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. “जनतेच्या भावना आपल्यासोबत आहेत,” असं उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले. राज्यातील सत्ता संघर्षावर 22 ऑगस्टला (उद्या) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला आहे. “जनता गद्दारांना धडा शिकवेल,” असंही ते म्हणाले.

कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, “यांच्याकडे सगळंच पैशांनी काम होतं. माझ्याकडे माझी रक्तामांसाची, जिवाला जीव देणारी माणसं आहेत. तुम्ही सदस्यपत्र घेऊन आलेला आहात तो मी पहिला टप्पा मानतो. कोर्टात काय व्हायचं ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. जनतेच्या भावना आपल्यासोबत आहेत.  लोकं निवडणुकीची वाट बघत आहेत. निवडणुका कधी येतात आणि या गद्दारांना आम्ही धडा शिकवतो. पण निवडणुका लवकर घेण्याची यांच्यात हिंमत आहे, असं मला वाटत नाही” असंही ते म्हणाले.

शिवसेनेत फूट पडली आणि उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे हा संघर्ष कोर्टात गेला. या सुनावणीकडे महाराष्ट्रासह देशभराचं लक्ष लागलं आहे. मात्र, अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही.

शिवसेना नक्की कुणाची उद्धव ठाकरे यांची की बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची याचा फैसला या सुनावणीत होणार आहे. मागील दोन सुनावणीत दोन्ही बाजूच्या ज्येष्ठ विधीज्ञांनी युक्तिवाद केला. या प्रकरणी 8 ऑगस्टला सुनावणी होणार होती. मात्र, ही तारीख बदलून 12 ऑगस्ट करण्यात आली आणि त्यानंतर ही तारीख पुन्हा बदलून 22 ऑगस्ट केली आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.