TOD Marathi

शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटांनं दिल्ली उच्च न्यायालयात (Uddhav Thackeray filed petition against EC decision in Delhi high court) धाव घेतली. चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. नैसर्गिक न्यायाच्या नियमानुसार निर्णय झाला नसल्याचा आरोप ठाकरे गटाने याचिकेत केला आहे.

यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ (MLA Sanjay Shirsat on Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा एखादा निर्णय आपल्या विरोधात लागतो किंवा अपेक्षित असा लागत नाही तेव्हा त्या निर्णयाच्या विरोधात अपील करण्याचा अधिकार आपल्याला घटनेने दिला आहे. मात्र जेव्हा चार वेळा यापूर्वी बाजू मांडण्याची संधी मिळाली तेव्हा पहिल्यांदाच बाजू मांडली असती तर ही वेळ आली नसती, त्यामुळे निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला त्याला घाई म्हणता येणार नाही.

ठाकरे गटाने निवडणूक आयोगात जाणे गैर नाही मात्र शिवसेना पक्षाचे धनुष्यबाने निवडणूक चिन्ह गोठवण्यात यावं, यासाठी आम्ही काहीही प्रयत्न केले नाहीत असे स्पष्टीकरणही संजय शिरसाट यांनी दिले. त्याचबरोबर पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह यासंदर्भातला मेल आमच्याकडून गेलेला आहे मात्र त्याबद्दल मी अधिक बोलू शकणार नाही असेही संजय शिरसाट म्हणाले.

दरम्यान, निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पक्षाचे नाव आणि चिन्ह म्हणून तीन-तीन पर्याय मागितले होते. त्या पद्धतीने काल उद्धव ठाकरे यांनी तर आज एकनाथ शिंदे यांनी आपले पर्याय निवडणूक आयोगाकडे दिलेले आहेत. मात्र दोघांच्याही पक्षाच्या नावामध्ये बाळासाहेब ठाकरे हे नाव आहे, त्याचबरोबर दोघांचे दोन चिन्ह देखील सारखेच आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे असा ‘सामना’ निवडणूक आयोगाच्या कक्षेत पाहायला मिळू शकेल. दोन्ही गटांनी चिन्ह आणि पक्षांची नावे दिल्यानंतर आता निवडणूक आयोग काय भूमिका घेते? याकडेही सगळ्यांचे लक्ष लागलेल आहे.