TOD Marathi

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महिनाभरात पाच वेळा दिल्लीला येतात, यातच सर्व आलं. यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कदाचित वर्षभरात चार वेळाही दिल्लीला आले नसतील. दोन लोकांचं बेकायदेशीर सरकार राज्य चालवत आहे, निर्णय घेत आहे असा घनाघात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. (Sanjay Raut Shivsena)

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, 16 आमदार अपात्र ठरतील. त्यांना स्वतःचा बचाव करण्यासाठी एखाद्या पक्षात सामील व्हावं लागेल आणि अशा वेळेस ते स्वतःला शिवसैनिक कसं म्हणून घेतील? त्यांची तशी मानसिकता तरी आहे का? आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि भविष्यात महाराष्ट्रात सत्ताबदल झालं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असेही राऊत म्हणाले.

औरंगाबाद महानगरपालिका शिंदे गट आणि भाजप एकत्र लढणार आहे, (Aurangabad Municipal Corporation) या संदर्भात राऊत यांना विचारले असता भाजपला शिवसेना फोडायची होती. महाराष्ट्राला मराठी माणसाला दुबळा करून वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये ते अशे प्रयत्न करतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दुसऱ्या पक्षाचे आहेत. त्यांना का दिल्लीला यावं लागतं, यावर मी बोलणार नाही. त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या कारवाईची टांगती तलवार आहे. न्यायालयावर आम्हाला विश्वास आहे योग्य ती कारवाई होईल.

यावेळी संजय राऊत यांनी अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांचे अभिनंदन केलं की त्यांनी स्पष्टपणे कबूल केलं माझ्यावर दबाव आहे, मी तणावात आहे.
ईडी कारवाईबद्दल बोलताना ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा मी शिवसैनिक आहे. मी कुठल्याही कारवाईला सामोरा जायला तयार आहे.

गुजरात मध्ये काल विषारी दारूमुळे जे 50 बळी गेले त्या विषयी चर्चेची मागणी मागणी करणाऱ्या खासदारांना निलंबित करण्यात आलं, अशी लोकशाही आम्हाला नकोय. लोकांचे प्रश्न सोडवता आले पाहिजेत, ही लोकशाही हवीय असेही ते म्हणाले.