TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 30 जुलै 2021 – अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीचा पती राज कुंद्रा याला अटक झाल्यानंतर प्रसारमाध्यमं आणि विविध संकेतस्थळांवरून मानहानीकारक माहिती प्रसिद्ध करण्यास मज्जाव करावा, अशी मागणी करत अभिनेत्री शिल्पा शेट्टीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर आज शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीवर प्रसारमाध्यमांनी बातम्या केल्या, तर बदनामी कशी ?; असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री शिल्पा शेट्टीला केला आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने या याचिकेत समाजमाध्यमांसह वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांना प्रतिवादी केलं होतं. उद्योगपती राज कुंद्राचा जामीन अर्ज कनिष्ठ न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने ही याचिका केली होती. या याचिकेवर शुक्रवारी मुंबई हायकोर्टमध्ये सुनावणी झाली.

प्रसारमाध्यमांमध्ये दिलेल्या बातम्या या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीवरून करत आहेत. त्याला आव्हान कसं दिलं जाऊ शकतं? तो बदनामीचा प्रकार कसा म्हटला जाऊ शकतो?, हे म्हणजे शिल्पा शेट्टीविषयी काहीच बोलू नका, असे सांगण्यासारखं आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी या सार्वजनिक जीवन जगत आहेत.

त्यांच्या विषयीच्या बातम्यांमध्ये लोकांना स्वारस्य असते. आणि प्रसारमाध्यमांनी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर राज कुंद्रा प्रकरणामध्ये झालेल्या चौकशीविषयी बातम्या प्रसिद्ध केल्या असतील, तर त्याविषयी बदनामीचा दावा कसा होऊ शकतो?,’ असा प्रश्न न्यायालयाने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे वकील अॅड. डॉ. बिरेंद्र सराफ यांना विचारला.

मुंबई हायकोर्टाने वकील अॅड. डॉ. बिरेंद्र सराफ यांना सांगितले की, तुमच्या अशीलच्या पतीविरोधात गुन्हा दाखल आहे. आणि हे कोर्ट कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही. कोणीही आपला अशील असू शकतो, परंतु बदनामीसाठी कायदा आहे.

वृत्तपत्रांचा खप वाढवण्यासाठी या प्रकरणाशी संबंधित वृत्त अधिक रंजक करून प्रसिद्ध केलं जातं. त्यामुळे प्रतिवाद्यांना आपल्याविषयी चुकीचे आणि मानहानी करणारे वृत्त प्रसिद्ध करण्यापासून मज्जाव करावा, अशी मागणी शिल्पा शेट्टी यांनी याचिकेत केली होती.

आपल्याबाबतची चुकीची माहिती संकेतस्थळांवरून काढून टाकावी. समाजमाध्यावरूनही याबाबतचे व्हिडिओ हटविण्यात यावेत. तसेच माफी मागण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने या याचिकेद्वारे केली होती.