TOD Marathi

OBC Reservation : माझ्या हाती सूत्रं दिल्यास ओबीसींना पुन्हा आरक्षण देईन, अन्यथा आरक्षण न दिल्यास राजकारणातून संन्यास घेईन – Devendra Fadanavis

टिओडी मराठी, नागपूर, दि. 26 जून 2021 – महाराष्ट्रातील ओबीसींचे आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं आहे. मात्र, तरीही महाविकास आघाडी सरकार मोदी सरकारवर खापरं फोडतं आहे. माझ्या हाती सूत्रं दिल्यास ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण देईन आणि आरक्षण न दिल्यास राजकारणातून संन्यास घेईन, अशा पवित्रा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निर्णयाविरोधात आज राज्यभरात भाजपने चक्काजाम आंदोलन केलं आहे. राज्यात भाजपचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

‘आम्ही ५० टक्क्यांच्या वर असलेलं आरक्षण न्यायालयात वाचवलं. त्यासाठी राम शिंदे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या मंत्र्यांनी काम केलं. पण, महाविकास आघाडी सरकारनं वेळकाढूपणा करत आहे, असा घणाघात त्यांनी केला.

ओबीसी आरक्षणाचे मारेकरी काँग्रेसशी संबंधित असून त्यांची काँग्रेस कार्यालयामध्ये उठबस असते. त्यांनी या आरक्षणाबद्दल पुनर्विचार याचिका दाखल केली होती, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला टार्गेट केलं. आम्ही ओबीसी आरक्षणासाठी रात्री अध्यादेश काढला होता. मग, तो राज्यपालांकडे पाठवला. पण, महाविकास आघाडी सरकारने 15 महिने न्यायालयात शपथपत्र सादर केलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं आहे, अशी टीका त्यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारमध्ये ओबीसी नेत्यांची कुचंबणा होतेय. मात्र, राजकीय भवितव्याची चिंता असल्याने त्यांना याविरोधात बोलताही येत नाही. सरकारमधील मंत्र्यांनी मोर्चे काढण्याऐवजी न्यायालयात बाजू नीट मांडली असती तर आरक्षण गेलं असतं का?.

आज संपूर्ण देशात ओबीसींचे आरक्षण कायम आहे. काँग्रेसशासीत छत्तीसगड, राजस्थानातही आरक्षण कायम असताना महाराष्ट्र राज्यात मात्र ओबीसींना आरक्षण नाही. याला सर्वस्वी महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, अशी टीकावेंद्र फडणवीस यांनी केली.