TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 6 जुलै 2021 – अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील विविध विभागातील 15 हजार 511 रिक्त पदांची एमपीएसीकडून भरती केली जाणार आहे. या विभागांच्या पद भरतीसाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यातील स्वप्नील लोणकर तरुणाने आत्महत्या केली, याचे पडसाद राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावरही उमटले.

स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार आहे, अशी घोषणा विधानसभेत केली होती.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील विविध विभागातील १५ हजार ५११ रिक्त पदांची एमपीएससी कडून भरती केली जाणार आहे. या विभागांच्या पद भरतीसाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

ज्या ज्या विभागांनी रिक्त पदे भरण्याचे प्रस्ताव दिलेत, त्याला वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, २०१८ पासून विविध संवर्गातील रिक्त असलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत भरणार आहे. यापैकी गट अ – ४४१७, गट ब – ८०३१, तर गट क – ३०६३ इतकी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास वित्त विभागाने मंजुरी दिलीय.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्याचा फटका सर्वांना बसला. स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही वेदनादायी घटना आहे.

लोणकर कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. राज्यात यापुढे अशी घटना घडणार नाही, या संदर्भात आम्ही काळजी घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.