TOD Marathi

मुंबई :
विधानपरिषदेच्या निवडणुका एका दिवसावर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे. विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणुका होत आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचे सहा तर भाजपच्या पाच उमेदवार रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. दरम्यान मविआच्या उमेदवारांचा कोटा उद्या मुख्यमंत्री ठरवणार असल्याचं सांगितलं जातंय. सर्व आमदारांना मतदान प्रक्रिया समजावून सांगण्यात येत असून सर्वजण मतांची जुळवाजुळव करताना दिसत आहेत. (MLC Election Maharashtra 2022)

विधानपरिषदेची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होणार (Secret voting) असून यावेळी आमदार फुटण्याची शक्यता जास्त असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी आपापल्या आमदारांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले आहे. सर्वांनीच खबरदारी घेतली असून उद्या सर्व पक्षांच्या आमदारांची पुन्हा बैठक घेतली जाणार आहे.

राज्यसभेतील झालेल्या दगाफटका विधानपरिषदेला होऊ नये यासाठी मविआकडून सावध पवित्रा घेण्यात आला आहे. त्यातून गुप्त मतदान पद्धती असल्याने एका उमेदवाराला किती आमदारांनी मत द्यायचे हे मुख्यमंत्री शेवटच्या क्षणाला ठरवणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी मविआची रणनीती बदलण्याची शक्यता आहे. “दुध पोळलं तर ताक पण फुकून पितो.” असं अजित पवार म्हणाले आहेत. “सध्या आपापल्या पद्धतीने तयारी करावी शेवटच्या क्षणी मी आदेश देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.” असं अजित पवार म्हणाले आहेत. (Ajit Pawar statement)

दरम्यान भाजपही आपल्या मतांचे गणित जुळवताना पाहायला मिळत आहे. त्यांनी आपल्या सर्व आमदारांना जमा केलं असून मतांच्या आकडेवारीमध्ये गुंग असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. तर सर्व पक्षांच्या आमदारांच्या बैठकांना जोर आलाय. भाजपच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak) आजारी असताना मतदानासाठी हजर असणार आहेत. तसेच राज्यसभेच्या मतदानासाठी अॅम्बुलन्समधून आलेले चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman jagtap) यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून देवेंद्र फडणवीस निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी आम्ही पाचही जागांवर विजय मिळवणार असून महाविकास आघाडीची एक विकेट पडणार आहे असा दावा केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole on ED) यांनी आमच्या आमदारांवर ईडीचा दबाव टाकला जात आहे असा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष पण भाजपाला जाहीर पाठिंबा असणारे आमदार रवी राणा यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. मतदानाच्या तोंडावर घडत असलेल्या या घटनेमुळे सर्व पक्षांची आणि नेत्यांची धाकधूक वाढली असून सर्वांचेच बैठकीचे सत्र सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने रंगलेली चुरस ही विधानपरिषदेच्या निवडणुकीतही पाहायला मिळणार एवढं नक्की.