TOD Marathi

Maharashtra :  करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दोन वर्षांनंतर प्रथमच यावर्षी आषाढी एकादशीनिमित्त वारी सोहळा होत आहे. वारीसाठी राज्यभरातून हजारो पालख्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात. यंदा लाखोंच्या संख्येने येणाऱ्या वारकरी व भक्तांची संख्या पाहता त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या, त्यासाठी पंढरपूर येथे आरोग्य शिबीर आयोजित करा, त्यांना पिण्यासाठी नाममात्र दरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्या, असे स्पष्ट निर्देश परिवहनमंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले. यात्रेदरम्यान महामंडळाने वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयी-सुविधांची मी स्वत: पाहणी करणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले.

पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) यात्रेसाठी ४ हजार ७०० गाड्या सोडणार असल्याचेही अनिल परब यांनी घोषित केले. पंढरपूर यात्रेदरम्यान एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे वारकरी, भाविक तसेच प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे, त्याचबरोबर श्री विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना सुखरूप घरी सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी ही एसटीवर असते. यंदा यात्रेसाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर परब यांनी शुक्रवारी मंत्रालयातील दालनात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. यावेळी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह विविध विभागांचे महाव्यवस्थापक आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

वारकरी तसेच सर्वसामान्य नागरिक हे एसटीचे खरे प्रवासी दैवत आहेत. त्यामुळे पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांची आणि नागरिकांची काळजी घेणे आपले काम आहे. भरपावसात लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूर येथे पालख्यांसोबत चालतात. त्यांच्या सेवेसाठी एसटीनेही हातभार लावत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पंढरपूर येथे आरोग्य शिबीर आयोजित करावे, अशी सूचनाही अनिल परब यांनी केली. प्रवासादरम्यान बस बंद पडल्यास पर्यायी बसची व्यवस्था करा. तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी चालकांना वेगावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना द्या, असे परब म्हणाले.

आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी राज्यभरातील असंख्य गावातून लाखोंच्या संख्येने नागरिक पंढरपूरकडे (Pandharpur) रवाना होत असतात. मात्र, अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी महामंडळाने समूह आरक्षणाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश दिले. नागरिकांनी समूह आरक्षण केले, तर त्यांना गावच्या ठिकापासून ते पंढरपूर येथील विठुरायाच्या दर्शनानंतर थेट त्यांच्या गावात सोडण्याची व्यवस्था केली जाईल, असेही परब म्हणाले.