TOD Marathi

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकावर पुन्हा एकदा अनेक गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पार्टरनरचे कसाबशी संबंध असल्याचा गंभीर आरोपही आज पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी केलाय. २६/११ च्या हल्ल्यात अधिकाऱ्यांनी वापरलेले बुलेटप्रूफ जॅकेट निकृष्ट असल्याचे म्हणत किरीट सोमय्या यांनी नवा आरोप केला आहे.

यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे.

“मी जाणीवपूर्वक सांगू शकतो की नवाब मलिक यांचे संबंध दाऊद गॅंगपर्यंत पोहचू शकतात तर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचे संबंध कसाब पर्यंत आहेत. हेमंत करकरेंना देण्यात आलेले बुलेटप्रूफ जॅकेट हे बोगस होते त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हे जॅकेट बिमल अग्रवाल यांनी पुरवले होते. यशवंत जाधव यांच्यावर ज्यावेळी धाड टाकण्यात आली त्यावेळी बिमल अग्रवाल यांचे नाव पुढे आले होते,” असे किरीट सोमय्या म्हणाले.

“ही मोठी गमतीशीर गोष्ट आहे. कशाचा तरी कशासी संबंध जोडायचा प्रयत्न आहे. त्यांना कुठून माहिती मिळते हे मला माहिती नाही. पण या गोष्टीमध्ये तथ्य आहे असे मला वाटत नाही,” असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.