TOD Marathi

राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election) शिवसेनेशी दगाबाजी केल्याचा आरोप असणारे आमदार देवेंद्र भुयार यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अपक्ष आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापर्यंत पोहोचताच येत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. याउलट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे कोणत्याही आमदाराचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी वेळ देतात, त्यांचे म्हणणे ऐकून घेतात. मी आज सकाळी त्यांना पहाटे ५ ला भेटीसाठी फोन केला होता. त्यांनी मला लगेच भेटीसाठी ७.४५ ची वेळ दिली, असे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (MLA Devendra Bhuyar upset with CM Uddhav Thackeray work style)

यावेळी देवेंद्र भुयार यांनी अपक्ष आमदारांच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या संजय राऊत यांच्या आरोप फेटाळले. अपक्ष आमदारांवर कायम अविश्वास दाखवायचा, हे योग्य नाही. अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे मी राज्यसभा निवडणुकीत मतदान केले. शिवसेनेची भूमिका अशीच राहिल्यास भविष्यात आम्ही तुमच्यासोबत राहायचे की नाही, याचा विचार करु, असा इशाराही भुयार यांनी दिला होता पण यानंतर त्यांनी यावर सारवासारव केली आणि मी भाजपसोबत जाणार नाही असेही सांगितले. समजा संजय राऊत यांनी मतदान करु नका असे सांगितले तरी मी महाविकास आघाडीलाच मतदान करेन. कारण, मला भाजपची विचारसरणी पटत नाही, हेही देवेंद्र भुयार यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र भुयार यांनी महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवसेनेतील काही नेते आम्हाला मुख्यमत्र्यांपर्यंत पोहोचू देत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे झारीतील शुक्राचार्य ओळखले पाहिजेत, असे वक्तव्य देवेंद्र भुयार यांनी केले. तसेच मतांचा विषय संपला की अपक्ष आमदारांना नंतर कुणी विचारतही नाही, अशी खंतही भुयार यांनी बोलून दाखवली. जेव्हा सरकारला मतांची गरज असते तेव्हा अपक्ष आमदारांना ग्रँड हयात, ट्रायडंट यासारख्या मोठ्या फाईव्हस्टार हॉटेल्समध्ये बोलावले जाते. मात्र, एकदा का निवडणूक संपली की, अपक्ष आमदारांच्या तोंडाकडे कोणीही बघत नाही. हे अपक्ष आमदारांचं दुर्दैव आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मत देताना आम्ही काही गोष्टी कबूल करून घेणार आहोत, असे देवेंद्र भुयार यांनी म्हटले.

यावेळी देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मात्र कौतुक केले. अपक्ष आमदारांना सरकारच्या दृष्टीने फक्त निवडणुकीपुरते स्थान असते. नंतर त्यांच्या निधीबाबत किंवा अन्य प्रश्न सोडवले जात नाहीत. मात्र, आम्हाला केवळ आधार आहे तो म्हणजे मंत्रालयाचा सहावा माळा म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर भेटीसाठी वेळ देत नाहीत. अपक्ष आमदार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही, ही गोष्ट मी संजय राऊत यांनाही बोलून दाखवली होती. त्यांनीदेखील ही बाब कबूल केल्याचे आ. देवेंद्र भुयार यांनी सांगितले.