TOD Marathi

राज्यात बुधवारी झालेल्या दसरा मेळाव्यानंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की मी दोन्ही मेळावे म्हणजे उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) शिवाजी पार्कवरील मेळावा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बीकेसी मैदानावरील मेळावा असे दोन्ही मेळावे बघणार नाही कारण मी नागपुरात दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात असणार आहे. मात्र, त्यांनी गुरुवारी पुण्यात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना या विषयावर भाष्य केलं आणि एकाच वाक्यात प्रतिक्रिया देत विषय आटोपला. प्रतिक्रिया ही एखाद्या भाषणावर, कार्यक्रमावर द्यायची असते. शिमग्याच्या कार्यक्रमावर, शिमग्याच्या भाषणावर प्रतिक्रिया देत नसतात असं म्हणत टीका केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याबाबत बोलताना मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिंदेंच्या मेळाव्याला दिलखुलास दाद दिली. मेळाव्यातील गर्दी पाहून लोकांना कळलं असेल की कार्यकर्ते कोणाच्या सोबत आहेत, असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याची स्तुती केली. ते विकासावर बोलले असे देखील ते म्हणाले.

आता प्रत्येक वेळी एकच स्क्रिप्ट चालवण्यापेक्षा नवीन काहीतरी बोललं पाहिजे. दरवेळेस तेच ते भाषण असतं किंवा स्क्रिप्ट तरी बदला किंवा स्क्रिप्ट लिहिणारे तरी बदला असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर टीका केली. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात भाजप त्याच बरोबर आरएसएस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांची स्तुती देखील केली होती.