TOD Marathi

रत्नागिरी : रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे आणि काँग्रेसचे माजी खासदार व महाराष्ट्राचे माजी कायदामंत्री हुसैन भाई दलवाई यांचे आज संध्याकाळी मुंबई हाॅस्पीटलमध्ये दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांचे वय १०० वर्षे होते.

दलवाईंनी १९६२ ते १९७८ यादरम्यानच्या काळात विधानसभेत खेड मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. १९७७ ते १९७८ मध्ये एक वर्ष महाराष्ट्राचे कायदामंत्रीपद भुषविण्याचा मानही त्यांना मिळाला.

तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांना डिसेंबर १९८४ मध्ये लोकसभा निवडणूक लढण्याचा आग्रह केला आणि त्या निवडणुकीत ते रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.

दलवाई यांचे विविध भाषांवर प्रभुत्व होते. मराठी, संस्कृत, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभूत्त्व होते. त्यांच्या निधनाने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. आमदार भास्कर जाधव यांनीही त्यांना आदरांजली वाहिली आहे.