TOD Marathi

नागपुर:
अनेक वर्ष राज्यातील जी राजकीय परंपरा होती, त्या परंपरेला मोडून हे गद्दार सरकार नव्या गोष्टी पुढे नेत आहे. अशी जळजळीत टीका आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. (Aditya Thackeray on state government) शिवसेनेच्या निष्ठा यात्रेला, संवाद दौऱ्याला तुफान प्रतिसाद मिळतोय, असे देखील ते म्हणाले. (Shivsena Nishtha Yatra) किरीट सोमय्या यांच्यावर बोलणं मात्र त्यांनी टाळलं. पक्ष बांधणी दौऱ्यानिमित्त आदित्य ठाकरे (Aditya Thackeray in Nagpur) नागपुरात आले आहेत, याप्रसंगी ते बोलत होते.

शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे आणि राहील. खोके सरकार किती दिवस टिकेल हे लवकरच कळेल. राज्यातील हे सरकार दडपशाहीचे सरकार आहे. असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळी शिंदे गटावर जोरदार टीका करत गद्दारांचा मुखवटा आता फाटत आहे आणि हळूहळू त्यांची भूमिका पुढे येत आहे. त्यांना एक निमित्त हवं होतं आणि त्यांनी हे निमित्त काढलं, अशी देखील टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

एकंदरीत या दौऱ्यादरम्यान पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं. या दौऱ्यानिमित्त विदर्भात पक्ष संघटना वाढवण्याच्या दृष्टीने आदित्य ठाकरे यांचा भर राहील असं चित्र दिसतंय.