TOD Marathi

पुणे :  

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Yuvasena Chief Aaditya Thackeray Pune) यांची ‘शिव संवाद’ यात्रा पुण्यात होती. पुण्यातील कात्रज चौकात आदित्य ठाकरे यांची सभा झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी हिम्मत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोरे जा, जनतेचा कौल घ्या, असं म्हणत बंडखोरांना थेट आव्हान दिलं. (Aaditya Thackeray criticized Shinde group MLAs)

कात्रज येथील ‘शिव संवाद’ मेळाव्याला शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी बोलताना तेहतीसाव्या दिवशीही राज्य मंत्रीमंडळासाठी तिसरा माणूस सापडला नाही, दोघांमध्ये खरा मुख्यमंत्री कोण हेही त्यांना कळलेलं नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे, घटनाबाह्य आहे, त्यामुळे हे सरकार कोसळणारच म्हणजे कोसळणारच असं प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केलं.

पूर परिस्थितीमध्येही आपल दोन लोकांचं सरकार नेहमी दिल्लीला जात आहेत. दिल्लीश्वर विचारत नाही त्यामुळं माझ्यानंतर हे लोक राज्यात दौरे सुरु करत आहेत. हे दोन लोक फक्त खालच्या पातळीच्या राजकारणाचा विचार करतात. मी वयाचं भान ठेऊन बोलतोय, काही लोक म्हणतात की मी आक्रमक झालोय, मात्र मी अजून आक्रमक झालेलो नाही. मला आक्रमकपणा दाखवायला लावू नका, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

12 खासदार आणि 40 आमदारांचा राजकीय जन्म शिवसेनेने घडवून आणला, यांच्यावर गरजेपेक्षा जास्त विश्वास टाकला ही आमची चूक झाली. आम्ही त्यांना मिठीत घेत असताना डोळे बंद केले तेव्हा त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. बंड करण्यासाठी ताकत लागते, हिम्मत लागते, या गद्दारांनी जे केलं ती गद्दारीच केली. यांना बंड करायचं होतं, उठाव करायचा असता तर महाराष्ट्रात केला असता. दुसऱ्या राज्यात पळून गेले नसते.

आसाममध्ये लाखो लोक बेघर झाले, हे खरे शिवसैनिक असते तर पुरात उतरून मदत केली असती, मात्र हे हॉटेलमध्ये मजा मारत राहिले, हे स्वतःला शिवसैनिक समजतात. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (ShivSena Chief Uddhav Thackeray) यांनी जेव्हा वर्षा बंगला सोडला, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू होते मात्र काही लोक पेढे वाटत होते. हे शिवसैनिक असू शकत नाही. खरच हिम्मत असेल तर राजीनामे द्या आणि जनतेचा कौल घ्या असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आव्हान दिलं मात्र मातोश्रीचे दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत. आमच्या मनात राग, द्वेष नाही असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

आदित्य ठाकरे यांच्यासह यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार सचिन अहिर, खासदार विनायक राऊत, आदेश बांदेकर ही नेतेमंडळी होती. (Dr. Neelam Gorhe, Sachin Ahir, Vinayak Raut, Adesh Bandekar)