TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 12 जून 2021 – महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता यासंबधीचा शासन निर्णय जारी केला आहे. सुधारित मूल्यमापनाचे धोरण आणि निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

जागतिक कोरोना महामारीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य, सुरक्षितता व मानसिक स्वास्थ्य यांना प्राधान्य देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. 12 वीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावे, अशी मागणी केंद्र शासनाकडे केली होती. सीबीएसई व आयसीएसईच्या परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत.

सर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेअंती सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्याने परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा, असे महाराष्ट्र शासनाने केंद्राला यापूर्वी सुचवले होते, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.