TOD Marathi

प्राध्यापकांच्या 3 हजार जागा भरणार, प्रक्रिया अंतिम टप्प्यात; लवकरच जाहिरात निघणार – मंत्री Uday Samant

टिओडी मराठी, जालना, दि. 30 जून 2021 – महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात प्राध्यापकांच्या जागांसाठी भरती होणार आहे, अशी घोषणा केली होती. त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले प्राध्यापकांना दिलासा मिळाला होता.

याच पार्श्वभूमीवर आता या भरतीची कार्यालयीन प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली असून याची लवकरच जाहिरातही प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत दिली आहे. ते सध्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

जे प्राध्यापक तासिका तत्वावर आहेत, त्यांच्यासाठीही ही दिलासादायक माहिती आहे. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा तास आता 60 मिनीटाऐवजी 48 मिनिटांचा केला आहे. तर युजीसाठीचे मानधन 500 वरून 625 तर पीजी आणि लॉसाठी 600 वरून 750 रुपये इतकं वाढवलं आहे.

यासह विद्यपीठाच्या 629 पदांची आणि ग्रंथपालांची 121 पदांची देखील भरती होणार आहे, असे हि त्यांनी सांगितलं आहे. या दरम्यान संवर्ग बदली करून भरती करायचे असेल तर त्यात किमान दीड वर्ष जाणार आहे. त्यामुळे प्राध्यापक भरती ही पारंपरिक पद्धतीने केली जाणार आहे.

मात्र, आदिवासी मंत्रालय, ओबीसी मंत्रालय, सामाजिक न्याय मंत्रालय यांनी तसा प्रस्ताव पाठवल्यास पुढच्यावेळी संवर्ग बदली करून भरती करू, असेही उदय सामंत म्हणाले.