TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 24 मे 2021 – मागील महिन्यापासून महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग अधिक वाढला होता. हा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात लॉकडाऊन केला होता. सुरुवातीला राज्य सरकारने 15 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यानंतर आणखी पुढील 15 दिवसांसाठी वाढवून त्यानंतर 1 जून 2021 पर्यंत केला. आता प्रश्न उपस्थित होतोय तो 1 जूननंतर काय?. काय करणार हे सरकार? याबाबत ठाकरे सरकारने अनलॉकचे टप्पे सांगितले असून कोरोना नियंत्रणासाठी प्लॅन आखला आहे.

यादरम्यान, ज्या जिल्ह्यांत करोना रुग्णसंख्या कमी आणि मृतांचा आकडा कमी असेल त्या-त्या जिल्ह्यांमध्ये 1 जूननंतर लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता देणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी सांगितलं होतं. तसेच निर्बंध शिथिल करणार आहे, असेही त्यांनी सांगितलं.

याबाबत मिळालेली माहिती अशी, 1 जून 2021 नंतर ठाकरे सरकार लॉकडाऊन उठवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करेल. यावेळी राज्य सरकार चार टप्प्यात अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात करणार आहे, अशी माहिती समोर आलीय.

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकाने उघडण्यास मुभा दिली जाणार आहे. मागील काही दिवसांत दुकाने बंद असल्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. परिणामी, पहिल्या टप्प्यात हे सर्व व्यवहार सुरु करण्यावर भर देणार आहे.

तर, तिसऱ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंटस, बार सुरु केले जातील. त्यानंतर चौथ्या टप्प्यात सरकारकडून लोकल सेवा आणि धार्मिक स्थळे सुरु करण्यात येईल. याच काळात जिल्हाबंदी कधी उठवायची? याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेणार आहे, असे सांगितले आहे.