TOD Marathi

मुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. ज्या परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले, ते आज कुठे आहेत? आरोप करणाराच पळून गेलाय, असे वक्तव्य अनिल देशमुख यांनी केले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात हजर राहिले. ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यापूर्वी ट्वीट करत अनिल देशमुख यांनी आपली बाजू सविस्तर मांडली होती. मला ज्यावेळी ईडीचा समन्स आला. तेव्हा मी ईडीला चौकशीत सहकार्य करत नसल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. पण जेव्हा जेव्हा मला ईडीचा समन्स आला तेव्हा तेव्हा त्यांना सहकार्य केलेय, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

सचिन वाझे यांच्या बद्दल बोलताना ते म्हणाले, मी गृहमंत्री असताना सचिन वाझेला नोकरीवरुन काढण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत. परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या आरोपावर माझी चौकशी केली जातेय. माझ्या परिवाराला त्रास दिला जातोय. त्याबद्दल मला अतिशय दु:ख आहे, असं देशमुख म्हणाले.