TOD Marathi

मुंबई: खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म झालाय, खंजीर खुपसून शिवसेनेने सत्ता मिळवली आहे. खंजीर हा दोघातला समान दुवा आहे, असा टोला भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. सध्या राज्यात महावीकस आघाडीतील धुसफूस चांगलीच डोके वर काढत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. यातच आता माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते अनंत गिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार आरोप केले असून, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गिते यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर चांगलीच टीका केली आहे. टीका करताना ते म्हणाले, राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. मग जर दोन कॉंग्रेस जर एक होऊ शकत नाहीत तर मग आम्ही त्यांच्या विचारांचे होणे शक्य नाही. त्याच सोबत शरद पवार हे आमचे नेते होऊच शकत नाहीत, असे स्पष्ट मत त्यांनी या वेळी व्यक्त केलं.

पुढे बोलताना गिते म्हणाले, जरी राज्यात आघाडी सरकार असले तरीही आम्ही आघाडी सैनिक नाही आहोत. आम्ही शिवसैनिक आहोत शिवसैनिकच राहणार आहोत, असं म्हणत त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर चांगलाच हल्लाबोल केला असल्याचे समोर आले आहे.