TOD Marathi

चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा – RPI चे सचिन खरात यांची मागणी

टिओडी मराठी, मुंबई, दि. 12 जुलै 2021 – समाजव्यवस्था बिघडेल अशी वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा, अशी मागणी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. या अगोदरही संभाजी भिडे यांनी अनेक चिथावणीखोर वक्तव्य केली आहेत.

महाविकास आघाडी सरकार आल्यापासून शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे काही लोकांची माथी भडकवत आहेत, त्यांच्यामुळे समाज व्यवस्था बिघडत आहे, त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातून तडीपार करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाकडून केली आहे.

सतत संभाजी भिडे समाजव्यवस्था बिघडेल अशी वक्तव्य करत आहेत. त्यांच्या वक्तव्याला काही आधार, पुरावा नसतो. नुकतंच त्यांनी कोरोना म्हणजे थोतांड आहे, बाकी काही नाही. मंदिराचे कुलूप तोडा आणि वारकऱ्यांनी रस्त्यावर उतरावे, असे चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर या सरकारने गुन्हा दाखल करावा आणि त्यांना महाराष्ट्रातून तडीपार करावे, अशी मागणी खरात यांनी केली आहे.

संभाजी भिडे यांना तडीपार करण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे सचिन खरात यांनी केलीय. आज सांगलीमध्ये बोलताना संभाजी भिडे यांनी कोरोना वगैरे सगळे थोतांड आहे, असे म्हटले आहे. त्यावरुन सचिन खरात यांनी आक्रमक भूमिका घेतलीय.