TOD Marathi

राज्यसभा निवडणुकीत सत्ता आणि संख्याबळ असूनही पराभवाची नामुष्की ओढावल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता विधानपरिषद निवडणुकीसाठी अंग झटकून कामाला लागले आहेत असं दिसतय. विधानपरिषदेच्या दहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत मोठी चुरस रंगणार आहे. ही जागा भाजपने जिंकली तर अपक्ष आमदार आणि लहान पक्षांवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट होईल. ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या इमेजला मारक ठरू शकते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत विधानपरिषद निवडणुकीत बाजी मारण्याचा चंगच बांधलेला दिसत आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. (Vidhan Parishad Election 2022)

या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. बैठकीमध्ये विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे. विधानपरिषेदच्या दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत होणार आहे. ही जागा जिंकण्यासाठी अपक्ष आमदार आणि लहान पक्षांना हाताशी धरून मतांची जुळवाजुळव कशाप्रकारे करायची याची रणनीती आज वर्षा बंगल्यावरील बैठकीत आखली जाईल.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना १८ जून रोजी मुक्कामासाठी मुंबईत दाखल होण्याचा आदेश दिला आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्याने त्यांनी आधीपासूनच खबरदारीचे सर्व उपाय योजण्यास सुरुवात केलेली आहे. त्यासाठी त्यांनी निवडणुकीच्या दोन दिवस आधीच पक्षाच्या सर्व आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांना पवई येथील हॉटेल रिनेसन्समध्ये मुक्कामी बोलावले आहे. याच हॉटेलमधून सर्व आमदार विधान भवनात मतदानासाठी जातील. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने अनेक गोष्टी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे सहा तर भाजपचे पाच उमेदवार या निवडणुकीत आहेत.