TOD Marathi

गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे मराठा आरक्षणासाठी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत आहेत. दरम्यान, आता ते महाराष्ट्राच्या परिवर्तन क्रांतीची सुरुवात करणार आहेत. येत्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचं (Kranti Din) औचित्य साधून या क्रांतीला सुरुवात होणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आज यासंदर्भात ट्वीट केलं आहे. (Parivartan Kranti By Sambhaji Raje Chhatrapati)
संभाजीराजे आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, क्रांती दिनी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात.. भेटूया 9 ऑगस्ट रोजी तुळजापूरला…” त्यामुळे या महाराष्ट्र परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात ही तुळजापूरपासून होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी मोठी घोषणा केली होती. पुण्यात पत्रकार परिषद घेत आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होत. स्वराज्य या संघटनेची (Swarajya Sanghatana) स्थापना करणार असल्याचं जाहीर केलं होतं. या संघटनेचा प्रसार करण्यासाठी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे, असंही संभाजीराजे म्हणाले होते.
काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे मोठा वाद निर्माण होऊन तुळजापूर शहर बंदही ठेवण्यात आलं होतं. या प्रकारामुळे जनभावना दुखावली गेली होती.
दरम्यान, संभाजीराजे यांनी क्रांती दिनी तुळजापूर इथून परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात करणार असल्याचं ट्वीट केल्याने राज्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागलेलं आहे.