TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 8 जुलै 2021 – पावसाळी अधिवेशातील पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सभागृहात सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. त्याचबरोबर तालिका अध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सभागृहात केला होता. या गोंधळानंतर अखेर भास्कर जाधव यांची सुरक्षा वाढविली आहे, त्यांना दोन सुरक्षारक्षक दिले आहेत. हा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.

भास्कर जाधव यांनी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनामध्ये तालिका अध्यक्ष म्हणून योग्य भूमिका पार पाडली. भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, कोरोना, शेतकरी, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप अशा अनेक मुद्द्यांवरुन धारेवर धरण्याचा डाव आखणार असा अंदाज व्यक्त केला जात होता.

सुरुवातीला तसे चित्रही पाहायला मिळाले. पण, जेव्हा भास्कर जाधव तालिका अध्यक्ष म्हणून बसले. त्यावेळी सभागृहातील चित्रच पालटले. तालिका अध्यक्ष म्हणून जाधव यांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला.

जाधव यांच्या सभागृहातील पवित्र्यामुळे त्यांना सोशल मीडियातून धमक्या येत आहेत, असं महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यानंतर गृह खात्याने भास्कर जाधव यांना दोन सुरक्षारक्षकांकडून सुरक्षा दिले आहेत.

सुधीर मुनगंटीवार सभागृहात बोलताना विरोधकांनी त्यांना मध्येच टोकले. त्यावर अनिल देशमुख असेच मध्ये मध्ये बोलत होते. आता ते आत जात आहेत, अशी धमकी सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात दिली.

त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहामध्ये गोंधळ घातला. तर, विधानसभा अध्यक्षांनी हे वाक्य कामकाजातून काढून टाकण्याच्या सूचना दिल्यात.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या या विधानाला जोरदार आक्षेप घेतला. मुनगंटीवार सभागृहात धमकी देत आहे का?, असा सवाल पटोले यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी हे विधान कामकाजातून वगळण्यास सांगितले. भास्कर जाधव यांनी त्याला विरोध केला.

मला सुधीर मुनगंटीवार यांनी धमकी दिली. हे कामकाजातून काढून टाकू नका, कामकाजात हे वाक्य ठेवा. सुधीर मुनगंटीवार यांनी मला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे. ते रेकॉर्डवर ठेवा. यांच्या राज्यात सध्या तेच चालू आहे. ईडी, सीबीआय, एसआयटी लावली जातेय. त्यामुळे त्यांचे विधान रेकॉर्डवरून काढू नका, असे भास्कर जाधव म्हणाले.