TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 30 मे 2021 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014च्या निवडणुकीमध्ये जनतेला खोटी स्वप्ने दाखवून सत्ता मिळवली. पण, सात वर्षांत मोदी सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे, त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, असा हल्लाबोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

नरेंद्र मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काराभाराचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसने आज जिल्हा-तालुका स्तरावर काळ्या फिती लावून निदर्शने केली. तसेच मोदी सरकारचा निषेध केला.

करोनाची परिस्थिती हाताळण्यातही मोदी सरकार अपयशी ठरले आहे. पहिल्या लाटेत ‘नमस्ते ट्रम्प’च्या आयोजनात व्यस्त राहिले आणि परिस्थिती अंगलट येताच तबलिगीच्या नावावर खापर फोडून धार्मिक रंग देण्याचा उद्योग त्यांनी केला, असा आरोपही पटोले यांनी आहे.

यावेळी नाना पटोले म्हणाले, दुसऱ्या लाटेतही करोनाचे रुग्ण आणि मृत्यू वाढत असताना मोदी सरकार विधानसभेच्या प्रचारात दंग होते. मोदींनी आपल्या मनमानी कारभाराने 130 कोटी जनतेला करोनाच्या खाईत लोटले आहे. त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नसून मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली.

मोदी सरकार हे सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. महागाई प्रचंड वाढल्याने लोकांना जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेल सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. करोना महामारीत तर मोदी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणा केला.

जानेवारी 2021 मध्ये लसचे नियोजन केले असते तर आज लसीसाठी लोकांना रांगा लावाव्या लागल्या नसत्या. पण ,130 कोटी जनतेचा विचार करुन त्या प्रमाणात लसींची मागणी केली नाही. नंतर पाकिस्तानसारख्या देशाला मोफत लस वाटली आणि देशातील जनतेला वाऱ्यावर सोडले.

शेतकऱ्यांसह,जनतेला देशोधडीला लावले
सहा महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. पण, मोदींना त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शेतकरी, कामगार, कष्टकरी जनतेला देशोधडीला लावले आहे.

स्वातंत्र्यानंतर देश उभा करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून डॉ. मनमोहनसिंह यांच्यापर्यंत 70 वर्षांत देशाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी खूप मेहनत घेऊन देश उभा केला. पण, मोदींना आपल्या मुठभर उद्योगपती मित्रांसाठी रेल्वे, विमानतळ, बंदरे, बीएसएनएल, एलआयसी, पेट्रोलियम कंपन्या, बॅंका हे सर्व विकायला काढलं.

देश अधोगतीकडे घेऊन जाणाऱ्या मोदी सरकारचा कॉंग्रेसने आज काळा दिवस पाळून निषेध केला.