TOD Marathi

शिर्डी :
श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या विश्वस्त मंडळावर राज्य सरकारने नव्या ६ सदस्यांची नियुक्ती केली आहे. या सदस्यांमध्ये मीना शेखर कांबळी, सुनील सदाशिव शेळके, सुभाष दिगंबर लाखे, डॉ. जालिंदर बाळाजी भोर, दत्तात्रय पांडुरंग सावंत आणि सचिन पराजी कोते यांचा समावेश आहे. राज्य सरकारने एका अधिसूचनेद्वारे या नियुक्त्या केल्या आहेत तर शिर्डी नगरपालिकेचे नगराध्यक्ष हे पदसिद्ध विश्वस्त असणार आहेत.

या पू्र्वी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळावर ११ विश्वस्तांची नियुक्ती झालेली आहे. आजच्या सहा सदस्यांच्या नियुक्तीनंतर ही संख्या १८ इतकी झाली आहे.

यापूर्वी विश्वस्तांना धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नव्हते. अपुऱ्या विश्वस्तांची नियुक्ती करण्यात आल्याने अपुऱ्या मंडळाला कामकाज पाहता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले होते. याला संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती देत दैनदिन कामकाज पाहण्याची मुभा मंडळाला दिली होती. मात्र मोठे धोरणात्मक आणि आर्थिक निर्णय घेऊ नयेत असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. आता मात्र ६ नव्या सदस्यांच्या नियुक्तीनंतर विश्वस्त मंडळ परिपूर्ण झाल्याने साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.